- महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
- महसूल, ग्रामविकास, रोजगारहमी मंत्र्यांसह २३ आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश
- एक महिन्यात अहवाल शासनास सादर करणार
मुंबई: बारमाही शेतरस्ते मिळण्याचा मार्ग होणार मोकळा झाला असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली शेत व पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाची एक समग्र योजना समिती स्थापन करण्यात आली.
शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि शेतीच्या कामांसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा म्हणून ही समिती आपला अहवाल महिनाभरात देणार आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शेत रस्ते व पाणंद रस्त्यांबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शेत, पाणंद रस्ते मजबुतीकरणासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची ग्वाही दिली होती. यानुसारच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये ग्रामविकास, रोजगारहमी मंत्री तसेच वित्त, नियोजन, कृषी व मदत पुनवर्सन राज्यमंत्री यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अशा २३ जणांचा समावेश आहे.





















